नंदू गुरव
सांगली : गरम गरम भातावर दही घालून खाल्ल्याने अनेक जणांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याच्या घटना वारंवार घडतात. अंडी आणि फळे खाल्ल्यानेही अशीच परिस्थिती उदभवू शकते. आहारशास्त्रानुसार काही अन्नपदार्थ एकत्रित खाणे टाळावे, असे सांगितले आहे. तसे केल्यास पचनावर परिणाम होऊ शकतो, तसेच काही वेळा अस्वस्थता, ॲसिडिटी किंवा ॲलर्जीचा त्रासही जाणवू शकतो. त्यामुळेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ खाताना ते पुरक असावेत याची काळजी घ्यायची सुचना आहारतज्ञ करतात.
प्रथिने आणि पिष्टमय पदार्थ
अति जड दोन प्रकारचे पदार्थ एकत्र खाणं टाळा. उदाहरणार्थ एकाच वेळी मासळी आणि मटण, किंवा अंडी आणि पनीर एकत्र खाऊ नका. यामुळे यकृतावर ताण येतो आणि अन्नाचे नीट शोषण होत नाही.
फळे खाण्याची योग्य पद्धत
फळे नेहमी स्वतंत्रपणे खावीत, जेवणासोबत नको. जेवण झाल्यावर लगेच फ्रूट डिश खाणे टाळा. कारण, फळे लवकर पचतात, पण जेवणासोबत ती पोटात थांबल्यास तिथे त्यांची आंबायला सुरुवात होते. ज्यामुळे अपचन आणि पोट फुगते. शरीरावर त्याचे विपरित परिणाम होतात.
विरुध्द शाकाहारी अन्नपदार्थ
दूध व आंबट फळे (उदा. संत्री, लिंबू) : ॲसिडिटी, पोटदुखी होऊ शकते.
दूध व मीठयुक्त पदार्थ : पचनक्रियेला त्रासदायक.
फळे व जड जेवण (उदा. फळे + भात/ पोळी) : फळे लवकर पचतात, तर जड अन्न उशिरा; त्यामुळे गॅस किंवा फुगवटा.
दही व गरम पदार्थ : काहींना अपचन किंवा आम्लपित्ताचा त्रास जाणवतो.
विरुद्ध आहार म्हणजे काय?
विरुद्ध आहार म्हणजे असे अन्नपदार्थ, की जे शरीराच्या प्रकृती, पचनशक्ती, ऋतू, वेळ किंवा पदार्थांच्या गुणधर्मांच्या विरुद्ध असतात आणि त्यामुळे आजार होऊ शकतात.
तापमान विसंगती
अति गरम आणि अति थंड पदार्थ एकापाठोपाठ घेऊ नका. उदाहरणार्थ गरम गुलाबजाम आणि व्हॅनिला आईस्क्रिम किंवा गरम चहा आणि थंड पाणी. यामुळे दातांचे इनॅमल खराब होणे, घसा बसणे आणि पचनसंस्थेवर थर्मल शॉक बसण्याची शक्यता असते.
दुधाबाबत काळजी घ्या
दूध हे पूर्णान्न आहे, पण ते इतर काही पदार्थांसोबत विष बनू शकते.
नका घेऊ : दूध आणि मीठ (उदा. चहा-चपाती किंवा दुधासोबत नमकीन पदार्थ).
नका घेऊ : दूध आणि आंबट फळे (उदा. स्ट्रॉबेरी/मँगो शेक, जर फळे पूर्ण पिकलेली नसतील तर).
नका घेऊ : मासे व दूध, मांस व दही/दूध, अंडी व फळे (विशेषतः गोड फळे).
संभाव्य दुष्परिणाम
अजीर्ण
त्वचारोग
ॲलर्जी
सांधेदुखी
आमवात
पित्तविकार
त्वचेवर डाग/खाज
दीर्घकालीन चयापचय विकार