विटा : पुढारी वृत्तसेवा : जे आपल्याबरोबर राहतील ते मावळे, जातील ते कावळे. येथून पुढे पक्षासाठी काम करणाऱ्या लोकांनाच संधी दिली जाईल, अशा स्पष्ट शब्दांत सांगली जिल्हा काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रम सावंत यांनी खानापूर तालुक्यातील काँग्रेसजनांना सुनावले. येथील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात तालुका काँग्रेस कमिटी आढावा बैठक तसेच जिल्हा व तालुकास्तरावर संघटन मजबूत होण्यासाठी सावंत यांच्या नेत्तृत्वाखाली बैठक पार पडली.
सावंत म्हणाले की, पक्ष संघटना मजबूत करणे गरजेचे आहे. जे आपल्याबरोबर राहतील ते मावळे, जातील ते कावळे. इथून पुढे पक्षासाठी काम करणाऱ्याच लोकांना संधी दिली जाईल. सर्वसामान्य कार्यकर्ता मोठा करणे हे पक्षाचे धोरण आहे. देशामध्ये सध्या विदारक परिस्थिती असून संविधान धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्याने पक्ष संघटना मजबूत करणे, हेच धोरण असेल व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणे यासाठी आम्ही कार्यरत राहणार आहोत.
आटपाडी तालुका काँग्रेस कमिटीचे निरीक्षक उपाध्यक्ष गजानन सुतार म्हणाले की, पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पक्षविरोधी काम करणे बंद झाले पाहिजे. आणि सगळ्या पक्षाची काम करायची आणि आम्ही काँग्रेसचे निष्ठावंत कसे आहोत, हे सांगायचे. असले प्रकार बंद झाले पाहिजेत.
यावेळी मजूर फेडरेशन चे संचालक रवीनाना भिंगारदेवे यांनीही पक्ष संघटना मजबूत करण्यासंबंधीच्या सूचना मांडल्या. तसेच किसनराव निकम, सयाजी धनवडे, बाळासाहेब पाटील यांचीही मनोगते झाली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सिकंदर जमादार, जतचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब कोडग, इस्लामपूरचे संदीप जाधव, विटा शहराध्यक्ष नंदकुमार पाटील, संभाजी पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस निखिल सुतार, मार्केट कमिटीचे माजी सभापती चंद्रकांत चव्हाण, सेवा दलाचे शहराध्यक्ष बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष सेवादल मच्छिंद्र महापुरे, किसनराव निकम, मुनीर शिकलगार, सुवासिनी शिंदे, संजय लकडे, शैलजा भिंगार देवे, माजी समाजकल्याण सभापती सदाशिव खाडे आदी उपस्थित होते.