सांगली : गेली पन्नास वर्षे सांगलीकरांच्या मानगुटीवर बसलेला फेसाळणारा शेरीनाला पुन्हा एकदा थेट कृष्णा नदीत मिसळू लागला आहे. शेरीनाल्याचे पाणी उपसणारे सहाही पंप बंद पडल्याने शेरीनाल्याचे पाणी थेट कृष्णेत मिसळत आहे. यामुळे सांगलीकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
कृष्णा नदीत मिसळणाऱ्या शेरीनाल्याच्या पाण्याची समस्या सांगलीसाठी डोकेदुखी ठरत आहे. शेरीनाल्याचे पाणी नदीत मिसळू नये, यासाठी शहराच्या बाजूने चार, तर दुसऱ्या बाजूने शेरीनाल्याचे पाणी उचलण्यासाठी दोन पंप बसवण्यात आले आहेत. एका बाजूचे चार पंप बंद पडून दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. शेरीनाल्यामध्ये माती आल्याने हे पंप बंद झाले आहेत. दुसऱ्या बाजूचे दोन पंपही नादुरुस्त झाल्याने चार दिवसापासून पंप बंद पडले आहेत. यामुळे गेल्या चार दिवसापासून शेरीनाल्याचे पाणी थेट कृष्णा नदीत मिसळत आहे. रविवारी दिवसभर मोठ्या प्रमाणात पांढराशुभ्र फेस नदीत मिसळत होता. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मात्र याची काहीच कल्पना नव्हती.
शेरीनाल्याचे सांडपाणी शुध्द करून तासगाव तालुक्यातील धुळगाव येथे शेतीला देण्याची योजना महापालिकेने राबविली आहे. यासाठी कवलापूर विमानतळाजवळ सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे केंद्र उभारले आहे. या केंद्रातील एक पंप नेहमी बंद असतो. शिवाय सांगलीपासून बुधगाव, कवलापूरपर्यंत शेरीनाल्याच्या पाईपलाईनला अनेकदा गळती लागते. पाण्याचा उपसा बंद पडल्याने कृष्णेच्या पाण्यात शेरीनाला मिसळू लागला आहे. त्यामुळे शहरवासियांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका ड्रेनेज आणि आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. नागरिकांतून याबाबत तीव्र नाराजी व संताप व्यक्त करण्यात येत आहे. शेरीनाल्याच्या पाण्याला अत्यंत दुर्गंधी येत आहे. हे पाणी नदीत मिसळू लागल्याने नदीच्या पाण्यालाही हिरवा रंग आला आहे. महापालिका प्रशासनाला मात्र याबाबत काहीच कल्पना नसल्याचे दिसून आले.