सांगली

सांगली : बुधगावमध्ये अपघातात चिमुकल्यासह महिलेचा मृत्यू; दहा जखमी

दिनेश चोरगे

बुधगाव; पुढारी वृत्तसेवा : बुधगाव-बिसूर रस्त्यावर बुधगावकडे येणारी प्रवासी रिक्षा आणि बिसूरच्या दिशेने जाणारी मालवाहतूक रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक झाली. यामध्ये रिक्षातील अश्विनी शीतल पाटील (वय 32) आणि राघव रमेश कोकाटे (1 वर्ष, दोघेही रा. बुधगाव, ता. मिरज) हे ठार झालेे; तर दहाजण जखमी झाले. ही घटना बुधवारी रात्री घडली.

यात्रेसाठी पाटील कुटुंबीय एकत्र आले होते. बिसूर येथील हॉटेलमध्ये जेवण करून पाच महिला, पाच लहान मुले असे सर्वजण रिक्षाने घरी परत येत असताना, बुधगावजवळ त्यांची रिक्षा व मालवाहतूक रिक्षा यांची जोरदार धडक झाली. दोन्ही वाहनांनी वेग आवरण्यासाठी ब्रेक मारले, पण खडीमुळे प्रवासी रिक्षा धडकून पलटी झाली. यामध्ये बसलेल्या महिला बाहेर फेकल्या गेल्या, तर काही आतच अडकून राहिल्या. त्यामध्ये अश्विनी आणि राघव एका बाजूला असल्याने त्यांना जोरदार मार लागला, तर ललिता ज्ञानदेव पाटील, सारिका शेखर पाटील, पौर्णिमा शैलेंद्र सावंत, कावेरी रमेश कोकाटे या महिला आणि स्वरा रमेश कोकाटे, समृद्धी शैलेंद्र सावंत, जयदीप शेखर पाटील, अवधूत शैलेंद्र सावंत ही लहान मुले जखमी झाली. तसेच रिक्षाचालक अरविंद पवार आणि मालवाहतूक रिक्षाचा चालक दोघेही जखमी झाले. वाहनांची जोरदार धडक झाल्यानंतर मोठा आवाज झाला. आजुबाजूच्या लोकांनी खासगी वाहनातून जखमींना सिव्हिल हॉस्पिटल आणि खासगी रुग्णालयात दाखल केले, पण अश्विनी पाटील आणि राघव कोकाटे मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

आनंदाने भरलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

अश्विनी हिचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. तिचा लग्नाचा वाढदिवस जानेवारीत साजरा करण्यात आला, तर तान्ह्या राघवचे जावळ गेल्या आठवड्यात थाटामाटात झाले होते. गावाच्या यात्रेसाठी सर्व कुटुंबीय एकत्र आले होते. पण क्षणातच या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT