सांगली ः पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील 27 विद्यालयांतील तब्बल 480 बालकलाकारांनी आज रंगभूमीवर वेगळाच प्रयोग सादर केला. सलग बारा तास 48 लोककलांचे त्यांनी सादरीकरण केले. या बालकलाकारांना दाद देण्यासाठी भावे नाट्यमंदिर खचाखच भरले होते. बालरंगभूमी परिषद शाखा सांगलीच्यावतीने हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नियामक मंडळ सदस्य मुकुंद पटवर्धन यांच्याहस्ते या महोत्सवाचा शुभारंभ झाला. बालरंगभूमी परिषद सांगलीचे अध्यक्ष नितीन खाडिलकर, उपाध्यक्ष जुई बर्वे उपस्थित होते. सूत्रसंचालन पीयूष काकडे, कविता बागलकोटे, वर्षा लिमये यांनी केले. परीक्षक म्हणून राम चौगुले, पद्माकर कुरकुटे, श्वेता कोंडीकर, सचिन चौधरी, धनश्री देशपांडे, विजय माने यांनी केले. या महोत्सवात एकल नृत्य 19, एकल गायन 14, एकल वादन 13, समूहगायन 11, तर समूहनृत्यात 16 संघांनी सहभाग घेतला. सादरीकरण करून लोककलेचा जल्लोष केला. महोत्सवात 27 विद्यालयांनी सहभाग घेतला होता. सकाळी 8 वाजलेपासून स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत ती रंगली होती.
एकलमध्ये बालकलाकारांनी संबळवादन, ढोल, ढोलकी, जागर, पिंगळा, कीर्तन, पाळणा, तबला, पोवाडा यासह तलवारबाजीचेही सादरीकरण केले. तसेच समूहमध्ये मंगळागौर, वंजारी नृत्य, वारकरी, डोंबारी नृत्य, आदिवासी नृत्य, वाघ्या-मुरळी, लावणीमधील सवाल-जवाब, भारूड, धनगरी ओव्या, सामाजिक संदेश देणारे नृत्य सादर केले. सायंकाळी नटराज दिंडी काढण्यात आली. म. के आठवले व पटवर्धन हायस्कूल यांचे झांजपथक यात सहभागी होते. कार्याध्यक्ष प्राची गोडबोले, कार्यवाह धनंजय जोशी, सहकार्यवाह वर्षा लिमये, कोषाध्यक्ष अमित मराठे, सदस्य राजेंद्र पोळ, प्रकाश जाधव, सुमित साळुंखे, कविता बागलकोटे, गोविंद गोडबोले, सचिन खुरपे, दयानंद चंदनवाले, अक्षय कुलकर्णी, शीला जामदार उपस्थित होते.