सांगली : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे 17 हजार कोटींपेक्षा जास्त रुपये शिल्लक आहेत. या पैशाचा लाभ राज्यातील बांधकाम कामगारांना देण्याऐवजी सरकारच्या जवळचे ठेकेदार आणि कंत्राटदारांना देण्यात येत आहे, असा आरोप करून सोमवारी बांधकाम कामगार फेडरेशनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भर पावसात मोर्चा काढण्यात आला. आंदोलनामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड, लातूर जिल्ह्यांतील बांधकाम कामगार सहभागी झाले होते. त्यामुळे सुमारे तासभर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. 20 हजार रुपये बोनस देण्यात यावा, यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोर्चासाठी विश्रामबाग चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा एकेरी मार्ग देण्यात आला होता.
याबाबत जिल्हाधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खर्या कामगारांऐवजी बोगस कामगार त्या पैशाचा गैरफायदा घेत आहेत. आज मंडळाकडे नोंदीत कामगारांपैकी 50 टक्के कामगार बोगस आहेत. मोर्चाची सुरुवात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली. मोर्चा विश्रामबाग चौक, मिरज रस्त्यामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. आंदोलनामध्ये संघटनेचे अध्यक्ष एम. एच. शेख, महासचिव भरमा कांबळे, प्रकाश कुंभार, उमेश देशमुख, डी. एल. कराड, के. नारायण, भगवानराव घोरपडे, मोहन गिरी, विक्रम खलकर आदी सहभागी झाले होते.