सांगली ः जिल्हा परिषदेच्या अनेक विभागात कार्यालयीन वेळेत कर्मचारी हजर नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे हालचाल रजिस्टरची अचानक तपासणी करण्यात येणार आहे. कार्यालयात सकाळी वेळेत हजर नसलेल्या आणि दिवसभर कार्यालय सोडून जाणार्या कर्मचार्यांवर कारवाई करणार आहे, असा इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक तृप्ती धोडमिसे यांनी दिला.
काही महिन्यांपूर्वी सीईओ धोडमिसे यांच्या सूचनेनुसार सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी अचानक तपासणी केली होती. त्यावेळी अनेक कर्मचारी गैरहजर असल्याचे समोर आले होते. संबंधित कर्मचार्यांचा एक दिवसाचा पगार कपात करण्याची सूचना देण्यात आली होती. त्यानंतर काही दिवस बहुसंख्य कर्मचारी वेळेत उपस्थित राहत होते. मात्र पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या...’प्रमाणे उद्योग सुरू झाला आहे. काही कर्मचारी नियमित वेळेत हजर नसतात. तसेच अनेकजण कार्यालयीन वेळेत इतर ‘उद्योग’ करत फि रत असल्याच्या तक्रारी येत आहेत. काहींचे संबंधित विभागप्रमुखांना हाताशी धरून इतर ‘उद्योग’ सुरू असल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्यांच्यावर कोण कारवाई करणार, अशी चर्चा जिल्हा परिषदेमध्ये आहे. त्यामुळे तपासणीत सातत्य ठेवण्याची मागणी होत आहे. अधिकारी, कर्मचारी वेळेत हजर नसल्याने लांबचा प्रवास करून आलेल्या लोकांना ताटकळत बसावे लागत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्यांनी याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.
जिल्हा परिषदेतील अनेक कर्मचारी अगदी प्रामाणिकपणे काम करत असतात. मात्र अनेकजण काम कमी आणि ‘उद्योग’ जास्त करत असतात. चहा, नाष्टा, जेवणाच्या नावावर कित्येकवेळ बाहेरच फि रत असतात. त्यामुळे कामानिमित्त आलेल्या लोकांना ताटकळत बसावे लागते. तसेच अनेकजण मोबाईलमध्ये गुंंग असतात. माहिती विचारल्यास उद्धट उत्तरे देतात, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे चहा, नाष्टा आणि जेवणाची वेळ निश्चित करा आणि नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करा, अशी मागणी लोकांतून होत आहे.