प्रमोद चव्हाण
तासगाव : नगरपालिका निवडणूक जाहीर झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ सुरू होऊन तीन दिवस झाले, तरी देखील तासगावमध्ये एकही अर्ज दाखल झालेला नाही. निवडणूक प्रथमदर्शनी तिरंगी होणार आहे असे चित्र दिसत असले तरी, एकमेकांचा अंदाज घेऊन थेट नगराध्यक्ष उमेदवारासह प्रभागातील उमेदवार देण्यात येतील, असे चित्र दिसत आहे.
गत लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आमदार रोहित आर. आर. पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांच्यात उडालेल्या ठिणग्या आणि त्यानंतर हे दोन्ही गट एकत्र येऊन निवडणूक लढवणार हे चित्र, याची आशा आता संपुष्टात आली आहे.
माजी खासदार संजय पाटील गटाकडे गेली 2 टर्म तासगाव नगरपालिका राहिली आहे. मात्र रोहित पाटील यांची जनसामान्य लोकांत असलेली नाळ, त्यांचा नम्र स्वभाव आणि आर. आर. पाटील यांचे जुने वलय यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर संजय पाटील गटाला नगरपालिकेसाठी चांगलीच धावपळ करावी लागणार, हे चित्र स्पष्ट आहे. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीसाठी केवळ 5 दिवस राहिले असताना, अद्याप दोन्ही पक्षांकडून नगराध्यक्ष उमेदवारासह एकाही प्रभागातील उमेदवाराचे नाव समोर आलेले नाही. इच्छुकांची मात्र यामुळे चांगलीच पंचाईत झाली आहे. प्रचार करावा तरी अवघड आणि नाही करावा तरी अवघड, अशा द्विधा मनस्थितीत इच्छुक अडकले आहेत.
रोहित पाटील यांच्यारूपाने सर्वात तरुण आमदार महाराष्ट्राला देण्यात आला. याच पार्श्वभूमीवर तासगाव नगरपालिकेसाठी नवीन चेहर्यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र सध्याच्या घडीला रोहित पाटील आणि संजय पाटील या दोन्ही गटातून ही जोखीम घेण्याची मानसिकता दिसून येत नाही. 2015 नंतर तासगाव नगरपालिकेत पुन्हा एकदा आबा गटाची सत्ता आणण्याचे आव्हान रोहित पाटील यांच्यासमोर असणार आहे, तर आहे ती सत्ता टिकवण्याचे शिवधनुष्य संजय पाटील यांना पेलावे लागणार आहे. त्यामुळे दोन्ही नेते प्रत्येक निर्णय पुढच्याचा अंदाज घेऊन घेतील यात शंका नाही.