मांजर्डे : तासगाव तालुक्यातील पश्चिम भागाला रविवारी सायंकाळी जोरदार गारपीटीसह पावसाने झोडपून काढले. यामध्ये नागाव, निमणी, शिरगाव कवठे व परिसरातील द्राक्ष, आंब्यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रविवारी सायंकाळी नागाव, निमणी, शिरगाव कवठे, नेहरूनगर, गोटेवाडी, येळावी परिसराला जोरदार गारपिटीसह पावसाने झोडपून काढले. मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळे रस्त्यावर व शेतामध्ये गारांचा थर साचला होता. यामध्ये द्राक्ष, आंबा, ऊस, मका यासह अन्य शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
द्राक्ष, आंबा शेतीचे मोठे नुकसान
या गारपिटीचा सर्वाधिक फटका द्राक्ष शेतीला बसला आहे. गारपिटीमुळे जवळपास 800 ते 900 एकर क्षेत्रातील द्राक्षशेती उद्ध्वस्त झाली आहे. खरड छाननीनंतर काडी तयार करण्याची प्रक्रिया सुरू असताना या गारपिटीमुळे द्राक्षवेलीवरील काड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काड्यांना गारांचा मारा बसल्यामुळे मोठ्या प्रमाणात काड्या मोडल्या आहेत. तसेच पाने पडली आहेत. काड्याला मोठ्या प्रमाणात गारांचा मारा लागल्यामुळे काडी तयार होऊन द्राक्ष येतील याची खात्री देणे अवघड झाले आहे.