सांगली : साखरेच्या दरात अभूतपूर्व वाढ झाली आहे. प्रतिकिलोची वाटचाल पंचावन्न रुपयांकडे सुरू आहे. घाऊक बाजारात साखरेचा दर प्रतिक्विंटल ४,५६० रुपयांवर गेला आहे. बाजारात किरकोळ विक्री ५० ते ५२ रुपये प्रतिकिलो अशी होऊ लागली आहे. गेल्या अनेक वर्षांत प्रथमच इतकी मोठी साखरेच्या दरातील वाढ प्रथमच झाली आहे.
यावेळी पावसाचा लहरीपणा, केंद्र सरकारने जुलै महिन्यासाठी जाहीर केलेला कमी कोटा आणि आगामी गळीत हंगामात साखर उत्पादनाबाबत कमालीची अनिश्चितता यामुळे साखरेच्या दराची उच्चांकी वाटचाल सुरू झाली आहे. यावेळी केंद्र सरकारने जुलैसाठी जाहीर केलेला कोटा अपुरा ठरू लागला आहे. दरम्यान, गेल्या महिनाभराच्या कालावधीत साखरेच्या दरात प्रतिक्विंटल जवळपास सहाशे रुपयांची वाढ झाली आहे. याचा सामान्यांना चांगलाच फटका बसू लागला आहे.
यावेळी पाऊस लांबला आहे. यामुळे साहजिकच उसाचे उत्पादन घटणार आहे. उसाचे उत्पादनच कमी झाल्यास साखरेचे उत्पादन कमी होणार हे स्पष्टच आहे. यामुळे मोठ्या व्यापाऱ्यांकडून साखर मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत असल्याचे जाणकारांतून सांगण्यात येते. देशभरातील अनेक साखर कारखाने यावेळी बंद झाले आहेत. यावेळी प्रथमच साखरेच्या दरात अभूतपूर्व तेजी आली आहे. मात्र याचा सामान्यांना चांगलाच फटका बसू लागला आहे. याआधी साखरेचा दर ४४ ते ४५ रुपयांच्या वर प्रतिकिलोला गेलेला नव्हता. मात्र आता ५२ ते ५३ रुपये प्रतिकिलो साखरेचा दर झाला आहे.