सांगली : येथील चिंतामणीनगर रेल्वे उड्डाण पुलावर गुरुवारी चार गर्डर बसवण्यात आले. यामुळे आता पुलाच्या बांधकामाला गती आली आहे. त्यामुळे येत्या दीड महिन्यात पुलाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. गर्डर बसवण्यासाठी या मार्गावरील रेल्वे वाहतूक दोन तास 20 मिनिटे बंद ठेवण्यात आली होती.
या पुलावर आतापर्यंत एकूण चार गर्डर बसवण्यात आले असून, त्यानंतर सळई बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता सुरू केलेले गर्डर बसवण्याचे काम सायंकाळी आठ वाजता पूर्ण झाले.
चिंतामणीनगर रेल्वे पुलाच्या भिंती बांधण्यात आल्या. एकूण आठ गर्डर बसवण्यात येणार असून, यातील चार गर्डरबसवण्यात आले. मोठ्या क्रेनच्या साहाय्याने गर्डर ठेवण्यात आले. रेल्वे अधिकारी एन. एम. शिंदे यांच्यासह पुलाचे ठेकेदार उपस्थित होते. गर्डर बसवल्यानंतर पुलाच्या कामाला गती प्राप्त होणार आहे. याबाबत पालकमंत्री सुरेश खाडे आणि आ. सुधीर गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वे अधिकार्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी पुलाचे बांधकाम 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते.
रेल्वे पुलाचे बांधकाम जुलैअखेरीस पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रशासनाकडे मागणी केली आहे. वेळेत काम पूर्ण करून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी आम्ही मागणी केली आहे, अशी माहिती नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी दिली.