सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात स्थायी समितीने तब्बल 5 कोटी रुपयांची वाढ करत तो सर्वसाधारण सभेकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. यामुळे मूळ 1383 कोटी 38 लाख 18 हजार 401 रुपयांचा अर्थसंकल्प वाढून अंदाजे 1388 कोटींच्या घरात पोहोचला आहे. येत्या 30 मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी दिली जाणार आहे, अशी माहिती स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी दिली. तर झोनच्या निधीमध्ये तब्बल 70 कोटीची कपात करून हा निधी पदाधिकाऱ्यांसाठी वळवल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे यांनी केला आहे.
यंदा प्रथमच स्थायी सतिमी सभापती रंजिता चाकोते यांनी नागरिकांच्या सूचनांना प्राधान्य दिले. ऑनलाइन व ऑफलाइन माध्यमातून एकूण 639 सूचना प्राप्त झाल्या असून त्यातील महत्त्वाच्या सूचनांचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प अधिक वास्तववादी व जनतेच्या अपेक्षांना पूरक असल्याचा दावा त्यांनी केला. विविध विकासकामांसोबतच काही नाविन्यपूर्ण योजनांचाही समावेश करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, विरोधी पक्षाने या अर्थसंकल्पावर तीव्र आक्षेप घेतला आहे. विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी हा अर्थसंकल्प अवास्तव आणि दिशाभूल करणारा असल्याचा आरोप केला. त्यांनी म्हटले की, झोननिहाय निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात करण्यात आली असून सुमारे 70 कोटी रुपयांचा निधी कमी करण्यात आला आहे. यातूनच 31 कोटी भांडवली कामांसाठी असताना झोनचा कमी केलेला 70 कोटीचा निधी पदाधिकाऱ्यांच्या प्राधान्य प्रकल्पांसाठी वळवण्यात आल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.
झोनचा निधी कपातीमुळे स्थानिक नगरसेवकांच्या विकासकामांवर थेट परिणाम होणार असून प्रभागातील मूलभूत सुविधा रखडण्याची शक्यता असल्याचेही शिंदे यांनी नमूद केले. झोनचा निधी कमी करून सत्ताधाऱ्यांच्या मनाप्रमाणे निधी वळवला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.
वास्तववादी बजेट
नागरिकांच्या सूचनांवर आधारित संतुलित आणि विकासाभिमुख अर्थसंकल्प तयार केला आहे. 30 मार्चच्या सर्वसाधारण सभेमध्ये याला मान्यात दिली जाईल. स्थायीच्या बजेट मध्ये सभागृहात बदल केले जातील. मात्र वास्तववादी बजेट सादर केल्याचा दावा स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी केला आहे.
निधी कमी केल्याचा आरोप
समाज कल्याण अर्थिक दुर्बल घटकासाठी बजेटच्या 5 टक्के प्रमाणे 8 कोटी 10 लाख निधी प्रशासनाने ठेवला आहे. हा निधी कमी करता येत नाही असे आयुक्त सांगत असताना 5 कोटींचा निधी सत्ताधाऱ्यांनी कमी केला असल्याचा आरोप शिवसेनेचे गट नेते अमोल शिंदे यांनी केला.