मृणाल वष्ट
सांगली : प्लास्टिक फुलांची सजावट करून पर्यावरणाला धोका करण्यापेक्षा चांदीच्या दुर्वा, फुले अर्पण करण्याची परंपरा सांगलीकर जपत आहेत. त्यामुळे दरवर्षी गणरायासाठी चांदीचा एक तरी दागिना खरेदी होतोच. यंदा चांदीच्या जास्वंद फुलांचा, दुर्वांचा हार आणि सुकामेवा, फळे हे आकर्षण आहे. गणेशोत्सव काळात गणपतीच्या दागिन्यांच्या खरेदीतून सुमारे 5 कोटींची उलाढाल होते, असे सराफांनी सांगितले.
गतवर्षापेक्षा यंदा गणरायाच्या चांदीच्या दागिन्यांना उत्तम प्रतिसाद आहे. मोदक, पान-सुपारी, केळी, सफरचंद, सुकामेवा देखील चांदीचा बनवला आहे. नाजूक कलाकुसरीचे दागिने खरेदी केल्यावर त्याची देखभाल अधिक करावी लागते. ते काळे पडू नयेत यासाठी खबरदारी घ्यावी लागते. ग्राहकांची तीदेखील तयारी असते. चांदीची पूजेसाठीची भांडी अधिक खरेदी केली जातात. चांदीचे मोठे हार वजनाने अधिक आहेत. त्यांची खरेदी यंदा अधिक होत आहे. चांदीचे कमी वजनातले दागिने, कलाकुसरीचे उंदीर, पान-सुपारी मीनावर्क केलेले दागिने कोलकाता, राजकोट, हुपरी येथून येतात. चांदीच्या दुर्वा- 500 पासून पुढे, त्रिशूल, परशू - 1500 पासून पुढे, जास्वंदीचे हार - 10 ग्रॅमपासून 1 किलोपर्यंत- दर - दहा हजारापासून दीड लाखापर्यंत, किरीट, झूल, कान - 10 ग्रॅमपासून 100 ग्रॅमपर्यंत.
गणपती हे सांगलीकरांचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे गणरायासाठी चांदीचे दागिने खरेदी करण्याची हौस दरवर्षीच दिसते. यंदा गणरायासाठी चांदीच्या दागिन्यांची रेलचेल आहे. जास्वंद फुले व वेगवेगळे हार यांना सर्वाधिक मागणी आहे. 100-150 सराफी दुकाने आहेत. सगळ्यांना गणेशोत्सव काळात दागिने विक्रीतून गणपतीचा प्रसाद लाभतोच.सावकार शिराळे खजिनदार, जिल्हा सराफ समिती, सांगली