विटा : शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र खानापुरातच होण्याबाबत पालकमंत्र्यांनी विधानसभेत व्यवहारिकता पाहून निर्णय घेऊ, असे म्हंटले आहे. परिणामी खानापूर मतदार संघाच्या पदरी निराशा पडण्याची दाट शक्यता आहे. मात्र आपण सर्वांना सोबत घेऊन ताकदीने प्रयत्न करू, अशी ग्वाही युवा नेते आणि विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी दिली. खानापूर येथे विद्यापीठ उपकेंद्र व्हावे, या मागणीसाठी आणि जनचळवळीची दिशा ठरविण्यासाठी वैभव पाटील यांनी खानापूर घाटमाथा येथे प्रमुख कार्यकर्ते व उपकेंद्र चळवळीतील कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत रविवारी (दि.१६) बैठक घेतली.
यावेळी पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीवेळी माजी मंत्री जयंत पाटील यांनी आपल्याला महाविकास आघाडीची राज्यात सत्ता आली की, पहिल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत हा प्रश्न मार्गी लावू, असा शब्द दिला होता. आता महायुती सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सर्व समाज घटकाच्या हिताच्या दृष्टीने तसेच खानापूर मतदारसंघाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल, असे वाटत होते. मात्र यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र कुठे करायचे याविषयी सूचक विधान केले. ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली जिल्ह्यात कोठे करायचे यासंदर्भात राज्य शासनाने एक राज्यस्तरीय समिती गठीत करून त्यांच्याकडून अहवाल मागितलेला आहे. येत्या १० एप्रिलपर्यंत हा अहवाल अपेक्षित आहे. त्यानंतर विद्यापीठ उपकेंद्र कोठे असावे, याबाबत व्यवहारिकता पाहून निर्णय घेण्यात येईल असे ना. पाटील यांनी सांगितले आहे. त्यांच्या एकूणच बोलण्यातून खानापूर मतदारसंघाच्या पदरी निराशाच पडण्याची शक्यता आहे. मात्र हे सर्व बघता १० एप्रिलपूर्वी आपण कोणत्याही परिस्थितीत हे विद्यापीठ उपकेंद्र खानापूर येथेच कसे करता येईल? यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत, असेही वैभव पाटील म्हणाले.