मिरज, पुढारी वृत्तसेवा : येथील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. सध्या डिव्हायडरचे काम सुरू आहे. हे काम अर्धवटस्थितीत असल्यामुळे हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे हा रस्ता आता धोकादायक बनला आहे.
या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून अतिशय संथ गतीने सुरू आहे. संबंधित ठेकेदाराने अनेक वेळा काम थांबविले होते. पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या प्रयत्नामुळे 27 कोटी रुपयांचे हे काम सुरू आहे. निधी मिळवण्यासाठी व काम चांगल्या दर्जाचे होण्यासाठी पालकमंत्री खाडे यांनी खूप प्रयत्न केले. हे काम वेळेत होण्यासाठीही अनेक बैठका त्यांनी घेतल्या. मात्र संबंधित ठेकेदाराने या कामाकडे अत्यंत दुर्लक्ष केले. त्यामुळे हे काम रखडत सुरू आहे. काही ठिकाणी या रस्त्यावर खड्डेही पडू लागले आहेत. या रस्त्याच्या दर्जाबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत.
राष्ट्रीय महामार्गच्या अधिकार्यांनी या कामाकडे लक्ष दिले नाही. त्या अधिकार्यांनी आता याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. सध्या छत्रपती शाहू महाराज चौक ते महात्मा गांधी पुतळा चौकापर्यंत आणि पुढे स्मशानभूमीपर्यंत रस्त्याच्या दुभाजकाचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्याच्या मधोमध काँक्रिटचे काम केले आहे. मात्र तेथे कोणत्याही प्रकारचे रिफ्लेक्टर किंवा लाल रंगाचे झेंडे लावण्यात आले नाहीत. त्यामुळे रात्री वाहनांना काँक्रिटीकरण दिसणार नाही. त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्गच्या अधिकार्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.