विठ्ठल नलावडे
शिराळा : कडक उन्हाळ्यामुळे शिराळा तालुक्यात पाणीटंचाईचे संकट गंभीर बनले आहे. शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्यातील धरणे व पाझर तलावातील पाणीसाठा वेगाने कमी होत असल्याने ऊस व भाजीपाला पिके धोक्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेतून करमजाईमार्गे विविध धरणांमध्ये तातडीने पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सध्या तालुक्यातील रेठरे धरणात 12 टक्के, शिवणी धरणात 16 टक्के आणि कार्वे धरणात 17 टक्के पाणी शिल्लक आहे. चांदोली धरणात 69 टक्के पाणीसाठा असूनही त्याचा पुरेसा लाभ तालुक्यातील शेतीला होत नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. मोरणा धरणात 42 टक्के पाणी उपलब्ध असून ते सात दिवस सोडले जाते व आठ दिवस बंद ठेवले जाते. या पाण्यावर सुमारे 495 हेक्टर ऊस व 438 हेक्टर रब्बी पिके अवलंबून आहेत.
शिवणी धरणातील पाणी गेटपर्यंत पोहोचत नसल्याने कालव्याद्वारे पाणी सोडणे बंद झाले आहे. परिणामी शिराळा, खेड व परिसरातील पिके वाळू लागली आहेत. तालुक्यातील 49 पाझर तलावांपैकी 20 तलाव पूर्ण कोरडे पडले असून उर्वरित तलावांमध्येही अत्यल्प पाणी शिल्लक आहे. विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळीही खालावली आहे. दरम्यान, उपविभागीय अभियंता शैलेश साळुंखे म्हणाले, वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत टाकवे, भटवाडी, बांबवडे, रेड, खेड व बेलदारवाडी या भागांना टप्प्या-टप्प्याने पाणी सोडले जात आहे. यामुळे संबंधित तलाव भरले जात आहेत. उपलब्ध साठ्याचा योग्य वापर करून पुढील नियोजन केले जाईल.