महेश कुलकर्णी
शिराळा शहर : शिराळा तालुक्यात केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेली पाणीपुरवठा योजना निधीअभावी रखडली आहे. योजनेतील अनेक कामे अपूर्ण असून, शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्याने कामे ठप्प आहेत.
तालुक्यात एकूण 82 कामांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी 45 कामे पूर्ण झाली असली, तरी 37 कामे अपूर्ण आहेत. या अपूर्ण कामांसाठी सुमारे 19 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचा अंदाज संबंधित विभागाने व्यक्त केला आहे.
सध्या काही ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्प, पाण्याच्या टाक्या तसेच वितरण व्यवस्था पूर्णत्वास गेलेली नाही. परिणामी, नागरिकांना पारंपरिक जलस्रोतांवर अवलंबून राहावे लागते.महिलांना पाण्यासाठी दररोजची पायपीट करावी लागते. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. जलजीवन मिशन योजनेच्या अंमलबजावणीत निधीअभावी निर्माण झालेला अडथळा दूर करणे आवश्यक आहे. अन्यथा, ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ पाण्यापासून वंचित राहावे लागणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.