सांगली : माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या पत्नी, माजी महसूलमंत्री शालिनीताई पाटील यांचे शनिवारी निधन झाले. शालिनीताई यांचे सांगली जिल्ह्यातील राजकारणात, सहकार, समाजकारणात भरीव योगदान होते. सांगलीच्या आमदार, खासदार, तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात महसूलमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. जिल्ह्यातील त्या पहिल्या महिला मंत्री होत्या. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या राजकारणात शालिनीताई यांची मोठी साथ लाभली.
शालिनीताई या उच्चशिक्षित, धाडसी, कणखर नेत्या होत्या. त्यांनी आपल्या ठाम निर्णयक्षमतेने आणि व्यक्तिमत्त्वाने महाराष्ट्राच्या राजकारणात छाप पाडली. वसंतदादा पाटील यांच्या पत्नी म्हणून राजकारणात त्यांचा दबदबा होता. 1980 मध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातून वसंतदादा पाटील विजयी झाले, तर 1980 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत सांगली मतदारसंघातून शालिनीताई पाटील विजयी झाल्या. शालिनीताई यांनी काँग्रेस (एस)चे नामदेवराव मोहिते यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या मंत्रिमंडळात शालिनीताई पाटील यांना महसूलमंत्री पदाची संधी मिळाली. महसूलमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.
दरम्यान, 2 फेब्रुवारी 1983 रोजी वसंतदादा पाटील तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. खासदारकीचा राजीनामा देऊन ते पुन्हा राज्याच्या सत्तेत आले. शालिनीताई पाटील यांनीही वसंतदादांसाठी सांगली विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा दिला. सांगली विधानसभा आणि सांगली लोकसभेची पोटनिवडणूक लागली. 1983 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत सांगली विधानसभा मतदारसंघातून वसंतदादा विजयी झाले, तर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत सांगलीतून शालिनीताई खासदार झाल्या. वसंतदादांच्या पत्नी म्हणून सांगली जिल्ह्याच्या राजकारणात, सहकार, समाजकारणात शालिनीताई यांचा चांगलाच दबदबा होता. त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात, सहकारात मोठे योगदान दिले.
सांगलीत सुरू झालेल्या लक्ष्मी महिला सहकारी बँकेच्या शालिनीताई संस्थापक-अध्यक्षा होत्या. महिला सहकारी बँकेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे पाऊल त्यांनी उचलले. ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करण्यात वसंतदादांचे मोठे योगदान आहे. त्यामध्ये त्यांना शालिनीताई यांचीही साथ लाभली. वसंतदादा पाटील हे चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. दि. 17 एप्रिल 1977 ते दि. 6 मार्च 1978, दि. 7 मार्च 1978 ते 17 जुलै 1978, दि. 2 फेब्रुवारी 1983 ते 9 मार्च 1985, दि. 10 मार्च 1985 ते दि. 1 जून 1985 या कालावधीत वसंतदादा मुख्यमंत्री होते. वसंतदादा मुख्यमंत्री होण्यात शालिनीताई पाटील यांची साथ मोलाची ठरली.
वसंतदादांच्या निधनानंतर सांगली जिल्ह्यात प्रकाशबापू पाटील यांचे नेतृत्व पुढे आले. शालिनीताई पाटील जिल्ह्याच्या राजकारणातून बाजूला गेल्या, मात्र त्यांनी आपल्या राजकारणाचे, सहकार, समाजकारणाचे काम सातारा जिल्ह्यातून सुरू ठेवले. शालिनीताई पाटील यांचे शनिवार,दि. 20 डिसेंबर 2025 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
माझे लहानपण शालिनीताई यांच्याबरोबर गेले. त्यांचा मी लाडका होतो. त्यांचा राजकारणामध्ये दरारा होता. शेवटपर्यंत मी त्यांच्या संपर्कात होतो. त्यांच्या धाडसी वृत्तीमुळे इंदिरा गांधी यांनी त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. त्या खूप महत्त्वाकांक्षी होत्या. त्याप्रमाणे त्यांनी त्या पूर्णही केल्या. वसंतदादा यांच्यावर पोस्टाचे तिकीट काढले, त्याचे प्रकाशन शालिनीताईंच्याहस्ते मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केले होते. शेवटपर्यंत त्या ताठ मानेने जगल्या. त्यांनी स्थापन केलेला साखर कारखाना सहकारी तत्त्वावर कायम राहावा, यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला.- प्रतीक पाटील, माजी केंद्रीय मंत्री
महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत करारी, धाडसी आणि स्पष्टवक्ते व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी महसूलमंत्री शालिनीताई पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याचे वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायक आहे. सत्तेच्या कुठल्याही दबावाला न जुमानता त्यांनी नेहमीच अन्याय, भ्रष्टाचार आणि शोषणाविरुद्ध ठाम भूमिका घेतली. त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांची कार्यपद्धती आणि सामान्य जनतेसाठी असलेली तळमळ आजही प्रेरणादायी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो, हीच प्रार्थना !- डॉ. विश्वजित कदम, आमदार