सांगली : रस्त्याची खरच गरज आहे की नाही, हे न पाहता राज्य शासन शक्तिपीठ महामार्ग करण्याच्या मागे लागले आहे. वाळवा तालुक्यातील जमीन माळरान नाही, ती पिकाऊ आहे, तरीसुद्धा तेथून नवीन रेखांकन काढले आहे, शेतकरी तो होऊ देणार नाहीत, असा इशारा आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत दिला.
गेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गाचे सांगली जिल्ह्यातील रेखांकन बदलत आहोत, अशी घोषणा केली होती. रेखांकन जाहीर करू तेव्हा जयंतराव त्याचे स्वागत करतील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले होते. वास्तविक, अधिवेशनात जयंतरावांनी शक्तिपीठवरून सरकारला धारेवर धरले.
जयंत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री सांगत होते की शक्तिपीठ महामार्गाला कुणाचाच विरोध नाही. सगळ्या जिल्ह्यांतून लोक येत आहेत. शक्तिपीठ आमच्या भागातून न्या, अशी निवेदने देत आहेत. जर ते खरे होते, तर मग शक्तिपीठचे रेखांकन कशासाठी बदलले, याचे उत्तर द्या. मी विरोधी बाकावर आहे, आता माझ्या मतदार संघातच हा महामार्ग घातला आहे. आमच्याकडे मोठे तीर्थक्षेत्र वगैरे नाही. आमच्या मतदारसंघातील शेतजमीन द्यायला शेतकऱ्यांचा विरोध असेल.
मराठवाड्यात विरोध...
ते म्हणाले, राज्यपालांच्या अभिभाषणात शक्तिपीठ महामार्गाचा उल्लेख केला आहे. ज्या मराठवाड्याने निजामांशी संघर्ष केला, त्या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये या महामार्गाला विरोध होत आहे. कशासाठी हा मार्ग रेटत आहात? हट्ट कशासाठी आहे? आमच्या मतदारसंघातून हा महामार्ग नेण्याची घोषणा झाली आहे. आमच्याकडे सगळी शेती पिकाऊ आहे. आम्ही प्रयत्नपूर्वक सगळीकडे पाणी पोहोचवले आहे. त्या ठिकाणी तुम्ही जमिनी घ्यायला निघाला आहात.