सांगली ः सत्तास्थापनेत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळावे, यासाठी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह आहे. याबाबत गुरुवारी मिरज येथे झालेल्या बैठकीत नेत्यांचे एकमत झाले आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेबाबत महायुती, महाविकास आघाडीमध्ये जोरदार खलबते सुरू आहेत. सत्तेचा पेच कायम असल्याने दिवसेंदिवस राजकीय हालचाली गतिमान झालेल्या आहेत. जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने सत्ता स्थापन करण्याबाबत सर्व राजकीय पक्षांनी प्रयत्न सुरू केले आहेत. सत्तास्थापनेबाबत कोणाशी युती करावी, सत्तेत आपल्याला काय हवे, याबाबत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची गुरुवारी मिरजेत बैठक झाली. बैठकीत भाजपकडून सत्तेत सहभागी होण्याबाबत चर्चा करण्यात येत असली तरी, काही नेत्यांची आघाडीसोबत जाण्याची इच्छा आहे. याबाबतही चर्चा झाल्याची माहिती मिळाली. मात्र अध्यक्ष पदाबाबत पक्षाच्या सर्वच नेत्यांमध्ये एकमत आहे. याबाबतचा ठराव करून प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला जाणार आहे. अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे. वरिष्ठ जो काही निर्णय घेतील, तो मान्य करण्यात येईल, यावर बैठकीत एकमत झाल्याची माहिती देण्यात आली.
बैठकीला जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, माजी खासदार संजय पाटील, माजी आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार राजेंद्र देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तम्मनगौडा रवी-पाटील, हर्षवर्धन देशमुख, अनिल पाटील उपस्थित होते. महाविकास आघाडीकडे 30 सदस्यांचे बलाबल आहे. त्यांना सत्तेसाठी अवघ्या एका जागेची गरज आहे. भाजपला सत्तेसाठी राष्ट्रवादीसह शिवसेनेला सोबत घ्यावे लागेल. सत्तेची समीकरणे आणि पक्षीय बलाबल यांची तुलना केल्यास, राष्ट्रवादी काँग्रेसला सद्यस्थितीत महत्त्वाचे स्थान आहे.