सांगली ः जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेबाबत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातील जिल्ह्यातील काही वरिष्ठ नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली आहे. तटकरे यांनी अगोदर गटनेता निवडा, मग पुढील चर्चा करू, अशी सूचना दिल्याची माहिती आहे. त्यामुळे सांगलीत शनिवारी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. यामध्ये गटनेत्याची निवड होणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल सोमवार, दि. 9 रोजी लागला. मात्र अजूनही अध्यक्ष, सभापती निवडीसंदर्भात कार्यक्रमाची घोषणा झाली नाही. निकाल लागून 16 दिवस झाले तरी निवडी रखडलेल्या आहेत. त्यामुळे नूतन सदस्यांसह सामान्यांमध्ये उत्कंठा वाढली आहे.जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक 18 जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मिळाल्या. त्यापाठोपाठ भाजपला 16, काँग्रेसला 11, शिंदेसेना 7, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला 6, तर जनसुराज्य, शिवसेना (उबाठा) आणि रयत क्रांतीला प्रत्येकी 1 जागा मिळाली. सत्तास्थापनेला आवश्यक असलेले 31 चे संख्याबळ युतीकडे आहे, तर महाविकास आघाडीला केवळ एका जागेची गरज आहे. मात्र युतीचे घटक पक्ष असलेल्या शिंदे-शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातील नेत्यांचे पाठिंब्याबाबत एकमत होताना दिसत नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झाला आहे.
शिंदे-शिवसेनेने अजूनही ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. आमदार सुहास बाबर यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतरच निर्णय घेऊ, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. मुंबईत नेत्यांच्या गुप्त बैठका सुरू आहेत. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवसांत सत्ता स्थापनेचा तिढा सुटेल, अशी शक्यता आहे.