सांगली : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठीचे मतदान 5 फेब्रुवारी रोजी होत असून, याच दिवशी कर्नाटक येथील मायाक्का चिंचली (जि. बेळगाव) यात्रा आहे. या यात्रेला सांगली जिल्ह्यातून किमान पावणदोन लाख भाविक जातात, असा अहवाल जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी निवडणूक आयोगाला पाठवला आहे. याबाबत आता निवडणूक आयोग निर्णय घेईल, अशी माहिती जिल्हाधिकारी काकडे यांनी दिली.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठीचे मतदान 5 रोजी होत आहे. या दिवशी चिंचली यात्रेचा मुख्य दिवस आहे. या यात्रेस सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा आदी जिल्ह्यांतून लाखो भाविक बैलगाड्या आणि वाहनांनी सहकुटुंब चिंचलीला जातात. सांगली जिल्ह्यातून किमान पावणेदोन लाख भाविक प्रत्येक वर्षी जात असतात, असा अहवाल निवडणूक आयोगाला दिला आहे. याचदिवशी मतदान झाल्यास टक्केवारी घटण्याची शक्यता आहे. भाविक दोन दिवसांनी म्हणजे 7 फेब्रुवारीपर्यंत गावाकडे परततात, त्यामुळे मतदान पुढे ढकलण्याची मागणी विविध पक्ष, संघटनांकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबत अहवाल मागविला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी काकडे यांनी अहवाल पाठवला आहे. आता पुढील निर्णय आयोगाच्या स्तरावर होणार आहे.