मिरज : मिरज तालुक्यातील रखडलेल्या पाणी योजना मिटवून हा प्रश्न कायमचा मिटवा, शिवाय रस्ते सुस्थितीत करा, अशी मागणी करत मिरज पंचायत समितीचे सदस्य आक्रमक झाले होते. पंचायत समितीच्या मासिक सभेला गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी देखील सदस्यांनी केली. येथे वसंतदादा पाटील सभागृहात मिरज पंचायत समितीची मासिक सभा गुरुवारी पार पडली. सभापती तनवी कमलेकर यांच्यासह सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सदस्य संदीप बंडगर, गायत्री घोरपडे, अमृता गावडे, रीधा मुजावर, सुहास मगदूम, संयोगिता कोळी, शोभा मोहिते यांच्यासह अनेक सदस्यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला. सावळी येथे पाणी कनेक्शनसाठी एक लाख रुपयांचे बजेट धरले आहे, ते रद्द करावे, अशी मागणी सदस्य बंडगर यांनी केली. पंचायत समितीचा डेटा ऑपरेटर असणाऱ्यांना मोठा पगार दिला जातो. मात्र ते काम करत नाहीत. त्यांनी काहीच कामे केलेली नाहीत, असा आरोप त्यांनी यावेळी केला. तालुक्यातील जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाणी योजनांचा आढावा घेण्यात आला. शिवाय पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजाचा आढावा झाला. जलजीवन योजनेतून होणारी कामे अपूर्ण आहेत, ती त्वरित पूर्ण करावीत, अशी मागणी सदस्यांनी केली.
उन्हाळा सुरू आहे, त्यामुळे पाण्याची टंचाई भासते. त्यामुळे ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. काही कामे निधी नसल्याने थांबली आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर सदस्य आक्रमक झाले. उन्हाळा संपल्यानंतर तुमची कामे होणार का? असा सवाल देखील सदस्यांनी विचारला. यावेळी तसा ठराव करून शासनाकडे निधीची मागणी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. पंचायत समितीच्या मासिक सभेला वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे उपस्थित न राहणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. या अधिकाऱ्यांना त्वरित नोटिसा काढण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.