सांगली: उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. जिल्ह्याचा पारा 40 वर पोहोचला आहे. सकाळी आठ-नऊ वाजल्यापासूनच तीव्र झळा बसू लागल्याने लोक उकाड्याने हैराण होत आहेत. लोक घराबाहेर पडायचे टाळत असल्याने दुपारच्या वेळी तर शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट होतो. पुढील चार दिवस उन्हाची तीव्रता राहण्याचा अंदाज आहे. आज, शुक्रवारी पारा 41 अंशापर्यंत जाण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
तज्ञांच्या मते उत्तर आणि उत्तर-पश्चिम भागाकडून येणाऱ्या उष्ण व कोरड्या वाऱ्यांमुळे तापमानात वाढ झाली आहे. हवेतील ओलावा कमी झाल्यामुळे सूर्याची किरणे जमिनीपर्यंत थेट पोहोचत आहेत. एल निनोचा प्रभाव आणि सिमेंटच्या जंगलामुळे तापमानात वेगाने वाढ होते आहे. त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत.
चार दिवस उष्णतेची लाट कायम शक्य
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस सांगलीकरांना दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. तापमानाचा पारा 41 अंशांपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
हे करता येईल...
1) दुपारी 12 ते 4 या वेळेत काम नसेल तर घराबाहेर पडणे टाळावे.
2) शरीरातील पाण्याची पातळी टिकवण्यासाठी पाणी, लिंबू सरबत, ताक आणि शहाळ्याचे पाणी भरपूर प्रमाणात घ्यावे.
3) घराबाहेर पडताना सुती कपडे, स्कार्फ, टोपी आणि चष्म्याचा वापर करावा.