सांगली : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने अद्याप आठ टँकर्सनी पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये जत तालुक्यातील ५ गावांना पाच टँकर्सनी, तर आटपाडी तालुक्यातील चार गावांना ३ टँकर्सनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या टँकर्सद्वारे दोन्ही तालुक्यांतील सुमारे दहा हजार लोकांना पाणी पुरवले जात आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासात शिराळा आणि वाळवा तालुक्यात केवळ तुरळक सरी पडल्या असून, उर्वरित जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली आहे. पावसाची उघडीप असली, तरी पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील तीन रस्ते अद्याप पाण्याखालीच आहेत. यामध्ये शिराळा तालुक्यातील मांगले-सावर्डे रस्ता आणि मिरज तालुक्यातील समडोळी-कोथळी व नांद्रे-ब्रम्हनाळ या रस्त्यांचा समावेश आहे.
वारणा धरणात २०.६५ टीएमसी पाणीसाठा
जिल्ह्यातील वारणा धरणात शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत २०.६५ टीएमसी पाणीसाठा झाला असून, या धरणाची एकूण साठवण क्षमता ३४.४० टीएमसी इतकी आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा-वारणा खोऱ्यातील व शेजारील विविध धरणांमधील पाणीसाठा आणि कंसात त्यांची एकूण साठवण क्षमता (टीएमसीमध्ये) पुढीलप्रमाणे आहे... कोयना : ५३.३२ (१०५.२५), धोम : ८.२२ (१३.५०), कण्हेर : ८.५७ (१०.१०), वारणा : २०.६५ (३४.४०), अलमट्टी : ८३.०० (१२३.००).
दरम्यान, सांगलीतील आयर्विन पुलाच्या ठिकाणी शुक्रवारी पाण्याची पातळी १०.६ फूट इतकी नोंदवली गेली असून, येथील इशारा पातळी ४० फूट आहे.