सांगली : सांगली व कुपवाड शहरासाठी वारणा उद्भव पाणीपुरवठा योजनेचा ४५२ कोटींचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) आता ४६६ कोटी रुपयांचा झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (एमजेपी) पुणे कार्यालयाकडून प्रस्ताव छाननीसाठी सेंट्रल प्लॅनिंग, डिझाईन ॲण्ड मॉनिटोरिंग (सीपीडीएम) सेल, मुंबईकडे सादर झाला आहे. छाननीनंतर तांत्रिक मान्यता होईल व त्यानंतर महासभेच्या मान्यतेने प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाच्या नगरविकास विभागाला पाठवण्यात येईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले.
सांगली व कुपवाडमध्ये नागरी वस्ती वाढत आहे. लोकसंख्येत वाढ होत आहे. वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये, यासाठी महापालिकेने वारणा उद्भव योजना पुढे आणली आहे. वारणा उद्भव पाणी योजनेसाठी महापालिकेने पुणे येथील कंपनीला प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम दिले होते. कंपनीने सुमारे चार महिने सर्वेक्षण करून डीपीआर तयार केला. या योजनेचा डीपीआर तयार करताना सांगली व कुपवाड शहरात २०५५ पर्यंतची संभाव्य लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. त्यानुसार योजना तयार केलेली आहे.
समडोळी हद्दीतील कोळकी भागातील वारणा नदीपात्रातून पाणी उचलून सांगलीत माधवनगर रोडवरील माळबंगला जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाणार आहे. तेथे या पाण्यावर प्रक्रिया करून ते सांगली व कुपवाड शहराला पुरवले जाणार आहे. यासाठी समडोळी येथे जॅकवेल उभारणे, जॅकवेल ते माळबंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत सुमारे ९ किलोमीटर मुख्य जलवाहिनी टाकणे, जलवाहिनीसाठी कृष्णा नदीवर पूल बांधणे, माळबंगला येथे ८१ एम.एल.डी. क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारणे, सांगली व कुपवाड शहरात नवीन २३ पाण्याच्या टाक्या बांधणे व या दोन्ही शहरांत अंतर्गत ५५० किलोमीटर लांब जलवाहिन्या टाकणे आदी कामांचा समावेश आहे.