जत : म्हैसाळ योजनेचे पाणी सोडावे, या मागणीसाठी उटगी (ता. जत) येथे उमदी–जत राज्य मार्गावरील नारायण समाधी परिसर चौकात सोमवारी (दि. ७) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे काही काळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. ‘हक्काचे पाणी द्या, नाहीतर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या’, अशी मागणी करत आंदोलकांनी शासन व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.
आंदोलनात माजी सभापती तम्मनगौडा रवी पाटील, ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज, महांतेश पाटील, महादेव अंकलगी, संजय माळकोटगी, चंद्रकांत डोळ्ळी, रामनिंग निवर्गी, प्रकाश कोळगेरी, प्रकाश कोळगिरी, दिलीप चव्हाण यांच्यासह शेकडो नागरिक व शेतकरी सहभागी झाले होते. दोड्डनाला मध्यम प्रकल्पात म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी सोडल्यास नागरिक, शेतकरी आणि पशुधनासाठी भविष्यातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होईल, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. माजी सभापती तम्मनगौडा रवी-पाटील यांनी शासनाने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करून पूर्व भागातील जनतेला हक्काचे पाणी द्यावे, अशी मागणी केली.
दरम्यान, उपविभागीय अधिकारी अनिकेत पाटील, स्थापत्य अभियंता विशाल वाघमोडे आणि सहाय्यक तंत्रज्ञ राजकुमार कुंभार यांनी १५ सप्टेंबरअखेर दोड्डनाला तलावाकरिता विसर्ग सोडण्याचे नियोजन केले आहे, असे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.