विलास साळुंखे
मांजर्डे : तासगाव तालुक्यातील येळावी आणि विसापूर महसूल मंडलात एप्रिलमध्ये झालेल्या पावसाच्या अधिकृत नोंदी संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. या चुकीच्या नोंदींमुळे हवामानावर आधारित फळपीक विमा उतरवलेल्या शेकडो शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवण्याचा डाव असल्याचा आरोप होत आहे. विमा कंपन्यांना नफा मिळवून देण्यासाठीच पर्जन्यमानाच्या आकडेवारीत फेरफार केल्याची चर्चा आहे.
एप्रिलमध्ये तालुक्यात अवकाळी पावसाने गारपिटीसह हजेरी लावली होती. दोन-तीन दिवस झालेल्या या पावसाने द्राक्षे, आंबा आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाने याचे पंचनामेही केलेे. अनेक शेतकऱ्यांनी बागांचा फळपीक विमा योजनेअंतर्गत विमा उतरवला होता. मात्र आता पावसाच्या ऑनलाईन नोंदींमध्ये मोठी तफावत आढळल्याने शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार आहे.
नोंदी ठेवणाऱ्या यंत्रणेकडून एकाच महिन्यात दोन वेगवेगळ्या नोंदी करण्यात आल्याचे समोर आले आहे. 22 एप्रिल आणि 30 एप्रिल अशा दोन तारखांना झालेल्या पावसाचे वेगवेगळे आकडे दिसत आहेत. प्रत्यक्षात पडलेल्या पावसापेक्षा कमी पावसाची नोंद केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पावसाच्या नोंदी कमी दाखवल्यामुळे विमा दावे फेटाळले जाण्याची शक्यता आहे. शासनाने यात गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना भरपाई मिळेल याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.