मांजर्डे : तासगाव तालुक्यातील वायफळे, सिद्धेवाडी,दहिवडी बिरणवाडी परिसरात बुधवारी दुपारी जोरदार वाऱ्यासह गारपीटी झाली.यामध्ये द्राक्ष शेतीसह आंबा,पेरू,भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे.
बुधवारी दुपारी या परिसरात अचानक जोरदार वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागली.यावेळी जवळपास अर्धा तास गारपीट झाली. यामुळे द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.अनेक ठिकाणी गारा व जोरदार वाऱ्यामुळे द्राक्षाच्या काड्या मोडल्या आहेत.काड्यांना जोरदार मार लागला आहे.झाडावरील पाने फाटली आहेत.सध्या अनेक बागेत काड्यांचा शेंडा मारून झाला असून गर्भधारणे योग्य काडी झाली होती.या काडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासह परिसरातील आंबा,पेरू व भाजीपाला उत्पादकांना सुद्धा नुकसान सहन करावे लागले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली.याचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.