निंबळक : तासगाव तालुक्याला वरदान लाभलेली आरफळ योजना पाण्याविना कोरडी पडली असून मुख्य कॅनॉलमध्ये जागोजागी मुरूमाचा खच पडला आहे. त्यामुळे पाणी वहनास अडथळा निर्माण झाला आहे. आरफळ कालव्यात मुरूम, दगडांचा खच आणि झाडांनी मुजलेले पोटकालवे आवर्तनापूर्वी सफाई करण्याची मागणी आहे.
आरफळ कालव्यामध्ये मुरूम आणि दगड टाकल्याने गेटच्या पाईप बंद झाल्या आहेत. पुढील आवर्तन येण्यापूर्वी मुख्य कालव्यामधील मुरूम आणि दगड काढून सफाई करण्याची मोठी आवश्यकता आहे. कालव्याच्या आवर्तन काळात असणारे पोटपाट व गेट बंद करण्यासाठी वारंवार मुरूम आणि दगडांचा वापर केला जातो. आवर्तन सुरू झाल्यानंतर शेतकरी पाण्यासाठी जीव धोक्यात घालून मुरूम काढण्याचा प्रयत्न करतात. यात काहींनी जीवही गमावला आहे. त्यामुळे वेळीच कालवा रिकामा असताना मुरूम, दगडांचे सफाईकरण होणे अत्यावश्यक आहे.