भिलवडी : खटाव (ता. पलूस) येथे पाण्याच्या टाकीच्या बांधकामावरून झालेल्या वादातून जातीवाचक शिवीगाळ, धमकी आणि मारहाण केल्याप्रकरणी 12 जणांवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ दुसऱ्या गटाकडूनही परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याप्रकरणी रोहित शामराव कांबळे (वय 43) यांनी भिलवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सार्वजनिक पाण्याची टाकी बांधण्याच्या कारणावरून हा वाद झाला. फिर्यादीनुसार, संशयितांनी संगनमत करून जातीवाचक शिवीगाळ करत फिर्यादीसह समाजातील महिला व पुरुषांना जमावाने मारहाण केली. यामध्ये संतोष कांबळे, मनोज कांबळे, नरेंद्र कांबळे, तेजस कांबळे यांच्यासह अश्विनी, शकुंतला, संगीता, सारिका आणि आशा कांबळे या महिलांनाही मारहाण झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी विश्वजित पाटील, प्रशांत पाटील, संजय पाटील, रणजित पाटील, रवी जंगम, अंकुश जंगम, आप्पासाहेब पाटील, सुरेश पाटील, सुयोग पाटील, प्रकाश पाटील, आदित्य पाटील आणि काकासाहेब पाटील (सर्व रा. खटाव) अशा 12 जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले करत आहेत.
दुसऱ्या बाजूने, सरकारी कंत्राटदार प्रशांत पाटील (वय 27) यांनी रोहित कांबळे, संतोष कांबळे, कुंदन कांबळे, विकास कांबळे, ओंकार पाटील आणि प्रसाद पाटील यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक भगवान पालवे आणि उपनिरीक्षक रोहिदास पावसे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. गावात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयितांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिस उपनिरीक्षक रोहिदास पावसे अधिक तपास करत आहेत.