तासगाव शहर : ‘माझी विकास आघाडी आहे आणि लोक माझ्यासोबत आहेत, त्यामुळे मला कोणत्याही पक्षाची गरज नाही’, असे विधान माजी खासदार संजय पाटील यांनी केल्याने त्यांच्या आगामी राजकीय भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा रंगली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी केलेल्या या विधानामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला वेगळे वळण मिळाले आहे.
मंगळवारी ‘श्रीं’च्या रथोत्सवानिमित्त पत्रकारांनी भाजप प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नावर संजय पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत विकास आघाडीच्या माध्यमातूनच सक्रिय राहण्याचे संकेत दिले. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत तासगावपासून दिल्लीपर्यंत जोरदार चर्चा सुरू होती. अगदी प्रवेशाच्या तारखा जाहीर होण्यापासून ते कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होण्यापर्यंतच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, प्रत्यक्ष प्रवेशाचा कार्यक्रम वारंवार पुढे ढकलला गेला. या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या विधानातून ते आगामी काळात विकास आघाडीच्या माध्यमातूनच राजकीय वाटचाल करणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
२०२९ पर्यंत प्रवेश बंद?
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सावर्डे येथे झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष राहुल महाडिक यांनी २०२९ पर्यंत तासगाव तालुक्यातील कोणत्याही राजकीय नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश होणार नसल्याचे जाहीर केले होते. या विधानाची आणि संजय पाटील यांच्या बदलत्या भूमिकेची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.
भाजपमध्ये अंतर्गत मतभेदांची चर्चा
तासगाव तालुक्यात पक्षाकडे कणखर नेतृत्व नसल्याचा दावा करत काही भाजप कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांची तालुक्यासाठी पालक म्हणून निवड करण्याची मागणी पक्ष नेतृत्वाकडे केली होती. तसेच संजय पाटील यांच्या भाजप प्रवेशाला पक्षातील एका गटाचा विरोध असल्याचीही चर्चा आहे. या सर्व घडामोडींमुळे तासगाव तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.