सांगली : तासगाव तालुक्यातील विसापूर व येळावी येथील हवामान केंद्राच्या डेटामध्ये पावसाच्या नोंदीबाबत संशयास्पद तफावत आढळून आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीच्या भरपाईपासून वंचित राहावे लागणार आहे. यामध्ये कृषी सहायक, संबंधित विमा कंपनी आणि राजकीय नेत्यांचा सहभाग आहे. याची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी खासदार संजय पाटील यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले की, विसापूर व येळावी येथे 22 एप्रिलरोजी अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. याचा फटका सुमारे बारा हजार द्राक्ष उत्पादकांना बसला. जितका पाऊस जास्त तितकी भरपाई शेतकऱ्यांना विमा कंपनीला द्यावी लागते. या अवकाळी पावसाची नोंद स्कायमेट व्हेदर सर्व्हिसेस या खासगी कंपनीच्या हवामान
केंद्रामध्ये डेटा स्वरूपात नोंद केली होती. या हवामान केंद्रातून कृषी विभाग, सांगली यांना प्राप्त झालेल्या डेटानुसार मोठ्या प्रमाणात तफावत आहे. प्राप्त डेटानुसार 22 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.16 वाजता तयार झालेल्या अहवालामध्ये तालुक्यातील अवकाळी पावसाची नोंद 21.06 मि.मी. अशी झाली. विसापूरची नोंद 59.8 आणि येळावीकरिता 59.8 मि.मी. अशी नोंद झालेली आहे. याबद्दलचा सविस्तर अहवाल सांगलीच्या कृषी विभागाकडे प्राप्त झालेला आहे. या कंपनीच्या हवामान केंद्रातून 5 मे रोजी सायंकाळी 4.59 वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार विसापूरकरिता 38.3 व येळावीकरिता 40.3 मि.मी. असा अहवाल कृषी विभागाला प्राप्त झालेला आहे. एकाच दिवशी म्हणजे 22 एप्रिलरोजी झालेल्या अवकाळी पावसाच्या दोन वेगवेगळळ्या नोंदीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. या दोन वेगवेगळ्या अहवालांपैकी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना सन 2025-26 अंतर्गत विमा कंपन्यांकडून कमी आकडेवारी असणाऱ्या अवकाळी पावसाची नोंद विमा कंपन्यांकडून ग्राह्य धरली गेल्यास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक तोटा होणार आहे.