मारुती पाटील
ईश्वरपूर : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अन्नधान्य, साखर, खाद्यतेल, गॅस, पेट्रोल, डिझेल यांसह दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती वाढल्याने घरखर्च भागविताना नागरिकांची दमछाक होत आहे. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च वाढत असल्याने अनेक कुटुंबांसमोर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
महागाईचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गीय आणि रोजंदारीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना बसत आहे. उत्पन्न वाढीचा वेग कमी असताना खर्च मात्र सातत्याने वाढत असल्याने अनेकांना संसाराचा गाडा चालवताना कसरत करावी लागत आहे. अनेक कुटुंबांना गरजेच्या वस्तूंच्या खरेदीतही काटकसर करावी लागत आहे. सुरुवातीला पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ झाली. त्याचा परिणाम हळूहळू इतर वस्तूंवर झाला आहे.
डाळी, तांदूळ, गहू, तेल, मसाले व आता साखर यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढत असल्याने किराणा खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यातच शाळा-महाविद्यालयीन शुल्क, औषधोपचार, वीजबिल, प्रवासाचा खर्च आणि घरभाडे यामुळे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. अनेकांचा कर्जाचा डोंगर वाढू लागला आहे. मजुरांनीही आता मजुरीत वाढ केली आहे. सरकारने महागाईवर नियंत्रण ठेवून सामान्य जनतेला दिलासा देण्याची मागणी होत आहे.