सांगली : येथील राजवाडा चौकात नो-पार्किंग क्षेत्रात उभ्या केलेल्या दुचाकींवर वाहतूक विभागाकडून नियमित कारवाई होते. वाहने उचलली जातात. मात्र त्याच ठिकाणी असलेल्या अनधिकृत खोक्यावर मात्र कारवाई होते. या खोक्याला कोणाचे अभय आहे, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
शहरात अनधिकृत खोक्यांची संख्या वाढत आहे. मध्यंतरी राजवाडा चौकात दोन अनधिकृत खोकी अवतरली होती. त्यामुळे मुख्य चौकातील वाहतुकीला अडथळा येत होता. त्याकडे लक्ष वेधल्यानंतर ही अनधिकृत खोकी हटवण्यात आली. मात्र काही दिवसांपूर्वी एक अनधिकृत खोके अवतरले आहे. या खोक्याच्या बाजूलाच नो पार्किंगचा फलक आहे. तेथे लावलेली वाहने वाहतूक शाखेच्या यंत्रणेकडून उचलली जातात. मात्र, तिथेच असलेल्या अनधिकृत खोक्याकडे कोणाचे लक्ष जात नाही. नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर तत्पर कारवाई आणि अनधिकृत अतिक्रमणाला संरक्षण, असा दुहेरी न्याय का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
डोळेझाक का?
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाचे शहरातील अनधिकृत खोकी, हातगाडे तसेच अन्य व्यवसायांच्या अतिक्रमणाकडे डोळेझाक होत आहे. त्याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहे.