सांगली : प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना अशैक्षणिक कामांमधून तत्काळ मुक्त करा, अशी मागणी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यासंदर्भातील निवेदन संघाच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले.
शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रशासनाला निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, मुख्याध्यापक व शिक्षकांना अशैक्षणिक कामांपासून मुक्त करावे, नोंदणीसह व्यवसायाशी संबंधित वैयक्तिक जबाबदारीचे निर्देश रद्द करा, अशी मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना सुरक्षित व पौष्टिक आहार मिळावा, या शासनाच्या उद्देशाला शिक्षक संघाचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र, अन्न साहित्याचा पुरवठा, शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका आणि भोजन तयार करण्यासाठी स्वतंत्र मानधनधारक यंत्रणा असताना, अन्न व्यवस्थेची वैधानिक जबाबदारी शिक्षकांच्या वैयक्तिक नावावर टाकणे अन्यायकारक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शासनाकडून स्पष्ट कार्यपद्धती जाहीर होईपर्यंत नोंदणी न केल्याच्या कारणावरून कोणत्याही मुख्याध्यापक अथवा शिक्षकाला सक्ती, कारणे दाखवा नोटीस किंवा शिस्तभंगाची कारवाई करू नये, अशीही मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हा कोषाध्यक्ष मोहन माने, ज्येष्ठ नेते शामगोंडा पाटील, सुभाष सातपुते, दत्तात्रय झळके, तानाजी कोडग, सचिन पाटील, आप्पासाहेब जाधव, विकास वायदंडे उपस्थित होते.