पोपट घोरपडे
म्हैसाळ : म्हैसाळ जिल्हा परिषद गटात झालेल्या तिरंगी लढतीत जिल्हा परिषद गट व दोन्ही पंचायत समिती गणात मनोज शिंदे गटाचे उमेदवार निवडून आले. या निकालाने मनोज शिंदे गटाला अधिक बळकटी आली आहे. गावपातळीवरील भाजपांतर्गत दोन गटातील वाद अधिक वाढत गेल्याने भाजप उमेदवारांचा पराभव झाल्याचे दिसत आहे.
म्हैसाळ जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्षा सचिन कांबळे, म्हैसाळ पंचायत समिती गणात गायत्री सुशांत घोरपडे व टाकळी पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्याच रिदा सुलेमान मुजावर या विजयी झाल्या. या पक्षाचे नेतृत्व मनोज शिंदे, मनोरमादेवी शिंदे - म्हैसाळकर यांनी केले. भाजपच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार नीलम महादेव दबडे, पंचायत समिती गणाच्या उमेदवार मोहिनी वाघमारे, कविता निकम यांचा पराभव झाला. या निष्ठावंत गटाचे नेतृत्व दीपक शिंदे, आबासाहेब शिंदे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या अपक्ष उमेदवार पूजा संजय दोड्डमणी, पंचायत समितीच्या अपक्ष उमेदवार मोहिनी धनंजय कुलकर्णी यांनाही पराभव पत्करावा लागला. या गटाचे नेतृत्व मेघराज शिंदे, धनंजय कुलकर्णी यांनी केले.
म्हैसाळ पंचायत समिती गणातील निवडणूक ईर्षेने झाली, मात्र प्रचारात प्रमुख नेत्यांनी परस्परांवर टीका टाळली. हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले. प्रत्येक पक्षाकडे कार्यकर्त्यांचे जाळे होते. सर्वच पक्षांचे कार्यकर्ते जिद्दीनेे लढले. दरम्यान, भाजपच्या म्हैसाळ पंचायत समितीच्या उमेदवार कविता निकम यांचे पती गणेश निकम यांचे निधन झाल्याने दु:खाचे सावट होते. त्यामुळे जाहीर सभा झाल्या नाहीत. त्यामुळे या गटाला प्रचाराला फारसा वाव मिळाला नाही. अर्थात भाजपच्या निष्ठावंत गटाला व बंडखोर गटाला हा निकाल आत्मचिंतन करायला लावणारा ठरला आहे.
दरम्यान, मनोज शिंदे - म्हैसाळकर गटाने कार्यकर्त्यांच्या साथीने नेटाने प्रचार यंत्रणा राबवली. निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना काँग्रेसच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांची साथ मिळाली नाही. तरीही म्हैसाळ जिल्हा परिषद व टाकळी, म्हैसाळ पंचायत समितीच्या दोन जागा तसेच नरवाड येथे काँग्रेसच्या तन्वी कमलेकर यांना शिंदे गटाने दिलेले बळ यामुळे मनोज शिंदे गटाचे राजकीय वजन वाढले आहे.