ईश्वरपूर : जिल्हा परिषद निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात टीका करणारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील व रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आ. सदाभाऊ खोत, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक हे एकमेकांचे कट्टर विरोधक गुरुवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले होते. निमित्त होते, येथील उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसीस विभागाच्या उद्घाटनाचे! जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवरून महाविकास आघाडी व महायुतीतील संघर्ष ताजा असतानाच हे नेते एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
येथील उपजिल्हा रुग्णालयात शासनाकडून 10 डायलिसीस मशीन उपलब्ध झाल्या होत्या. मात्र आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने या मशीन बंद अवस्थेत होत्या. शासनाने आवश्यक स्टाफ उपलब्ध करून दिल्याने आता रुग्णालयात डायलिसीस विभाग सुरू होणार आहे. यामुळे सामान्य रुग्णांना डायलिसीसची सुविधा माफक दरात उपलब्ध होणार आहे. या विभागाचे गुरुवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उद्घाटन करण्यात आले. यासाठी रुग्णालय प्रशासनाने सत्ताधारी व विरोधकांनाही निमंत्रित केले होते. आ. जयंत पाटील, आ. सदाभाऊ खोत, राहुल महाडिक, नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्याहस्ते या विभागाचे उद्घाटन झाले. यावेळी उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, गटनेत्या अरुणादेवी पाटील, शहाजी पाटील, नगरसेवक संग्रामसिंह पाटील, केदार पाटील आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने काल-परवापर्यंत एकमेकांच्या विरोधात टीका करणारे आ. जयंत पाटील व आ. सदाभाऊ खोत एकाच व्यासपीठावर आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. अर्थात हा कार्यक्रम राजकीय नव्हे, तर शासकीय होता. त्यामुळे या कार्यक्रमात नेत्यांनीही कोणतीही राजकीय टिपणी केली नाही. निवडणुका संपल्याने आता राजकीय मतभेद विसरून विधायक कामासाठी सत्ताधारी व विरोधक एकत्र येत असल्याने हा नवा पायंडा तालुक्यात पडत आहे, हेही चित्र आशावादी आहे!