ईश्वरपूर : ‘मैने कहा था ना, एन्ट्री लेट होगी लेकीन ग्रेट होगी; जिंदगी जीते है हम शान से, दुश्मन जलते है हमारे नाम से...’ असा हिंदीतील डायलॉग म्हणत आ. गोपीचंद पडळकर यांनी आ. जयंत पाटील यांना पुन्हा डिवचले. राजकीय चळवळ मोठी करायची असेल, क्रांती करायची असेल, तर वाळवा तालुक्यातील राजकीय गुलामगिरी झुगारून टाका, असे आवाहन आ. पडळकर यांनी केले. येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मंत्री पडळकर म्हणाले, धनगर समाजाची वेगळी संस्कृती आहे. आम्ही आस्तिक, देवाला मानणारे आहोत. अहमदनगरचे नामकरण अहिल्यानगर झाले. इस्लामपूरचे नामकरण उरूण-ईश्वरपूर झाले. हे झाल्याने अनेकांना वाईट वाटले. त्यावरून राजकारण झाले. आ. सदाभाऊ खोत, आ. सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक आदींनी ईश्वरपूर नामकरणासाठी प्रयत्न केले.
पडळकर म्हणाले, वाळवा तालुक्यात कर्मवीरांचे स्मारक नाही, अण्णा भाऊंचे स्मारक नाही. ईश्वरपुरात अहिल्यादेवींचे स्मारक कधी होणार? स्मारक करतो म्हणणारे आजपर्यंत झोपले होते काय? स्मारकासाठी आमचेच सरकार निधी देणार आहे. वाळवा तालुक्यातील तीर्थक्षेत्रांना सरकारने २४ कोटींचा निधी दिला आहे.
यावेळी माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, जनसुराज्यचे अध्यक्ष समित कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, विश्वनाथ डांगे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सागर मलगुंडे, गौरव नायकवडी आदी यावेळी उपस्थित होते. धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष अॅड. चिमण डांगे यांनी स्वागत केले. बजरंग कदम यांनी सूत्रसंचालन केले. शिवसेनेचे तालुका प्रमुख सागर मलगुंडे यांनी आभार मानले.