पाणी संघर्ष समितीतर्फे महावितरणवर मोर्चा 
सांगली

Sangli News : पाणी संघर्ष समितीतर्फे महावितरणवर मोर्चा

शेतीपंपासाठी सौरऊर्जेऐवजी नवीन वीज जोडणी देण्याचीही मागणी

पुढारी वृत्तसेवा

कडेगाव शहर : जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवणे बंद करा, शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी सौरऊर्जा योजनेची सक्ती बंद करून तत्काळ नवीन वीज कनेक्शन द्यावे आदी मागण्यांसाठी येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयावर पाणी संघर्ष समितीतर्फे मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी. एस. देशमुख म्हणाले, शहरात जुने मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर महावितरणकडून जबरदस्तीने बसवण्यात येत आहेत. याबाबत पाणी संघर्ष समिती व येथील नागरिकांच्यावतीने महावितरणचे उपकार्यकरी अधिकारी यांना भेटून विरोध दर्शवण्यात आला होता. बाळकृष्ण यादव म्हणाले, शासन हे सर्वसामान्य व शेतकरीविरोधी असून उद्योगपतिधार्जिणे आहे. तेव्हा महावितरणने जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवू नये. स्मार्ट मीटर बसवलेल्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात वीज बिल आकारणी होत असून ते सर्वसामान्यांना न परवडणारे आहे. यावेळी वंचितचे जीवन करकटे, अनिल जरग, संजय देशमुखे आदींनी भाषणे करून महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी. एस. देशमुख, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता किरण डोईफोडे, भाऊसाहेब यादव, बजरंग अडसूळ, अभिमन्यू वरुडे, संदीप देसाई, बाळासाहेब वत्रे, स्वाभिमानीचे इम्रान पटेल, संभाजी यादव आदी यावेळी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT