पलूस : विषारी द्रव पिलेल्या दाम्पत्याचा उपचार सुरू असताना रविवारी मृत्यू झाला. संजय तात्यासो पाटील (वय ४६) आणि त्यांच्या पत्नी मनीषा संजय पाटील (४२, रा पलूस) अशी मृतांची नावे आहेत. कर्जामुळे निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून पाटील दाम्पत्याने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. अशा पद्धतीने दाम्पत्याने जीवन संपविण्याची महिन्यातील ही दुसरी घटना. १ सप्टेंबरला अशीच घटना घडली होती.
पाटील दाम्पत्याने २ सप्टेंबर रोजी विषारी द्रव प्राशन केले होते. त्यांच्यावर सांगली व मिरज येथील रुग्णालयांत उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रविवारी (दि. ६) दोघांचाही मृत्यू झाला. दोन्ही घटनांबाबत पलूस पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे.
मनीषा यांनी २ सप्टेंबर रोजी विषारी द्रव प्राशन केल्यानंतर त्यांना प्रथम येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे हलविले होते. तेथे ५ सप्टेंबर रोजी उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी जाऊ दिले होते. घरी आल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला. नातेवाईकांनी त्यांना पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर रविवारी सकाळी त्यांना पुढील उपचारासाठी मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
संजय पाटील यांनाही २ सप्टेंबर रोजी विषारी द्रव प्राशन केल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात, तेेथून सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविले होते. त्यांच्यावर ५ सप्टेंबर रोजी उपचार केले. त्यानंतर त्यांना घरी जाऊ देण्यात आले होते. ६ सप्टेंबर रोजी सकाळी घरी असताना संजय यांना पुन्हा त्रास होऊ लागला. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले; पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
मोठा मानसिक तणाव; घरातील साहित्य जप्त
पाटील दाम्पत्य पलूसमध्ये हॉटेल व्यवसाय करीत होते. व्यवसायासाठी त्यांनी विविध फायनान्स कंपन्या, बँका तसेच काही खासगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. त्याच्या परतफेडीसाठी वारंवार तगादा होत असल्याने हे दाम्पत्य आर्थिक विवंचनेत होते. त्यामुळे ते मानसिक तणावाखाली असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
दाम्पत्य रुग्णालयात असताना एका फायनान्स कंपनीकडून त्यांच्या घरातील काही संसारोपयोगी साहित्य जप्त केल्याचीही माहिती नातेवाईकांनी दिली. रुग्णालयातून घरी परतल्यानंतर ही बाब त्यांच्या निदर्शनास आली होती. कर्जाचा तगादा आणि आर्थिक अडचणींमुळे या दाम्पत्यावर मोठा मानसिक ताण निर्माण झाला होता, असे नातेवाईकांनी सांगितले.