सांगली : स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवार, दि. १८ रोजी सांगली व सातारा जिल्ह्यातील एकूण १२ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली असून, चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यांतील एकूण ८९५ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिली.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी अपर जिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच खानापूर-विटा, वाळवा (ईश्वरपूर) आणि जतचे उपविभागीय अधिकारी क्षेत्रीय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. मतदानासाठी प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष व ४ कर्मचारी अशा एकूण ५ जणांच्या मनुष्यबळाची नेमणूक करण्यात आली असून एक टीम राखीव ठेवण्यात आली आहे. बुधवार दुपारीच मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रांचा ताबा घेतला आहे. मतदान केंद्र परिसरात मूलभूत सुविधा, मतदान साहित्याचे वितरण, वाहतूक व दळणवळण यंत्रणा सज्ज असून आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.