पलूस ः रामानंदनगर (ता. पलूस) पोस्ट कार्यालयातील शाखा डाकपाल (पोस्ट मास्तर) विजय शिवाजी पाटील (वय 28) यांनी पलूस येथील शिवदत्त कॉलनीतील राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना मंगळवार, दि. 26 रोजी दुपारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय पाटील हे अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच रामानंदनगर येथील पोस्ट कार्यालयात शाखा डाकपालपदी (पोस्ट मास्तर) शासकीय सेवेत रुजू झाले होते. अत्यंत शांत, मनमिळावू व कर्तव्यदक्ष म्हणून ते परिचित होते. मंगळवारी नेहमीप्रमाणे ते कार्यालयात गेले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ते कार्यालयातून घरी आले. त्यानंतर काही वेळातच त्यांनी राहत्या घरी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत त्यांचे निधन झाले होते. घटनेची माहिती मिळताच पलूस पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
विजय हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते. त्यांनी वालचंद महाविद्यालयातून मेकॅनिकल डिप्लोमा पूर्ण केला होता, तर आष्टा येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयातून पुढील पदवी शिक्षण घेतले होते. त्यांचे वडील लिपिक पदावरून निवृत्त झाले आहेत, आई पिग्मी एजंट म्हणून काम पाहते, तर मोठा भाऊ मुंबईत नोकरीस आहे. पाटील कुटुंबीय गेल्या 20 वर्षांपासून पलूसमध्ये वास्तव्यास होते. विजय यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. खेराडे-विटा (ता. खानापूर) या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.