सांगली : समस्त मुस्लिम समाज समिती मुस्लिम गोरक्षक दलाच्यावतीने बुधवारी मिरज येथील जनावरांच्या बाजारातून होणारी गोवंश पशू खरेदी- विक्री रोखण्यात आली. गांधीगिरी मार्गाने ही उपाय योजना करण्यात आली.
यावेळी कार्यकर्त्यांनी गायी व बैलांची मुक्तता करत गोसंवर्धन आणि संरक्षणाचा संदेश दिला. गोवंश खरेदी-विक्रीसाठी आलेल्या बांधवांना गुलाब पुष्प देत, शासकीय नियमांची माहिती सांगत आणि शांततेत प्रबोधन करत गोवंश खरेदी-विक्री रोखण्याचे कार्य करण्यात आले. गाय ही राष्ट्रीय पशू म्हणून घोषित झालीच पाहिजे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. काही गोरक्षक राजकीय हेतूने हिंदू-मुस्लिम समाजात द्वेष आणि तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना, सांगली-मिरज-कुपवाड येथील मुस्लिम बांधवांनी प्रत्यक्ष गोसंरक्षणाची भूमिका घेत आदर्श उभा केला. मुस्लिम समाजाने अशा शांततापूर्ण, सेवाभावी, प्रबोधनात्मक मोहिमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
यावेळी आसिफ बावा, युनूस महात, सलीम पन्हाळकर, मुद्दसर मुजावर, अक्रम शेख, हंजल बावा, रफीक महात, मौलाना इरशाद शेख, टिपू इनामदार, सूरज तांबोळी, मोहसीन शेख, समीर मालगावे, वाहिद कुरणे, शकील काझी, हैदर पठाण आदी उपस्थित होते.