शिराळा शहर : शिराळा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे लघु पाटबंधारे विभागाचा वाकुर्डे बुद्रुक (करमजाई) तलाव सोमवारी पहाटे पूर्ण क्षमतेने भरला असून, त्याच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तसेच, मोरणा धरणातील पाणीसाठाही झपाट्याने वाढून ७० टक्क्यांवर पोहोचल्याने परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे.
मे महिन्यापासून शिराळा तालुक्यातील मोरणा धरणासह परिसरातील तलावांतील पाणीसाठा वेगाने घटल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. वाकुर्डे योजनेतून मोरणा धरणात पाणी सोडण्यात आले होते; मात्र पुरेशा पावसाअभावी साठ्यात अपेक्षित वाढ झाली नव्हती. आता सलग झालेल्या दमदार पावसामुळे करमजाई तलाव तुडुंब भरल्याने त्याचा थेट लाभ मोरणा धरणाला होत आहे.
तालुक्यातील बहुतांश तलाव, बंधारे, ओढे आणि नाले दुथडी भरून वाहत असून मोरणा नदीही प्रवाहित झाली आहे. यामुळे खरीप हंगामासाठी पाण्याची उपलब्धता वाढली असून, बळीराजामधून समाधान व्यक्त होत आहे.