जत : दिल्ली येथे 'नीट' परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अहिंसक मार्गाने अन्नत्याग आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारने ताब्यात घेतल्याच्या घटनेचा जतचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष विलासराव जगताप यांनी तीव्र निषेध केला आहे. सरकारची ही कृती म्हणजे लोकशाहीची हत्या असून लोकशाही मूल्यांची गळचेपी करणारी आहे, अशी टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
जगताप म्हणाले, शिक्षणासह विविध क्षेत्रांतील गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सरकार विरोधी मत व्यक्त करणाऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. 'नीट' परीक्षा पेपरफुटीमुळे सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत सोनम वांगचुक यांनी तब्बल १८ दिवस अन्नत्याग आंदोलन करून विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून आंदोलनाची दखल घेण्याऐवजी, गांधीवादी मार्गाने आंदोलन करणाऱ्या वांगचुक यांना ताब्यात घेऊन आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही अत्यंत निषेधार्ह आणि लोकशाहीला न शोभणारी बाब आहे. देशात शिक्षण, रोजगार, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या मुख्य प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी जात, धर्म आणि भावनिक मुद्द्यांचे राजकारण केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली. सरकारविरोधात आवाज उठविणाऱ्यांवर कारवाई करण्याची प्रवृत्ती वाढत असून, यामुळे लोकशाही मूल्यांना धोका निर्माण झाला आहे.