ईश्वरपूर : लग्नातील बडेजाव व झगमगटावर होणारा खर्च टाळून यातून वाचलेली रक्कम पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेस देऊन तांबवे (ता. वाळवा) येथील नवदांपत्याने समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या निधीत वर्षाला भर घालण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे.
तांबवे येथील सामाजिक कार्यकर्ते रतन पाटील यांचा मुलगा धीरज व समृद्धी यांचा विवाह पुणे येथे पार पडला. हा विवाह पूर्णपणे साधेपणाने व पर्यावरणाचा विचार करून केला गेला. या विवाहाची वैशिष्ट्ये म्हणजे विवाहाला कोणीही मध्यस्थ नव्हता. दोन्ही कुटुंबांनी थेट चर्चा करून विवाह निश्चित केला. साखरपुडा, मोठा मंडप, वरात, डीजे, घोडा-हत्ती यावरील खर्च पूर्णपणे टाळला गेला. एक रुपयाचाही हुंडा दिला-घेतला नाही. फक्त 200 लोकांच्या उपस्थितीत विवाह पार पडला.
या विवाहातून वाचलेले 1 लाख 11 हजार 111 रुपये कृष्णाकाठ विकास प्रतिष्ठान, तांबवे या संस्थेला देणगी म्हणून दिले. या देणगीचा धनादेश राष्ट्रवादीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष सुनील माने यांच्याहस्ते संस्थेचे सचिव चंद्रकांत पाटील, सदस्य युवराज पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी रतन पाटील, सुनीता पाटील व नवदांपत्य धीरज, समृद्धी उपस्थित होते.