सांगली : कोविड-१९ महामारीनंतर जिल्ह्यात दहा हजारांहून अधिक बांबू रोपांची यशस्वी लागवड करण्यात आली. त्याचा पर्यावरणावर चांगला परिणाम दिसून येत आहे. सध्या जिल्ह्यातील बांबू लागवडीमुळे दररोज सुमारे ३० टन ऑक्सिजनची निर्मिती होत आहे, असा दावा मृदा व बांबू तज्ज्ञ तथा जिल्हा परिषदेचे मास्टर ट्रेनर डॉ. दीपक यरटे यांनी केला आहे.
यरटे म्हणाले, जिल्ह्यात शिराळा, पलूस, कवठेमहांकाळ, जत तसेच माळरान आणि डोंगराळ भागात बांबू वनक्षेत्र विकसित झाले आहे. मिरज-कुपवाड महापालिकेच्या एमआयडीसी परिसरातही पायलट प्रकल्पाद्वारे बांबूचे छोटे जंगल तयार करण्यात आले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे परिसरातून नामशेष झालेली चिमणीसारखी पक्षीप्रजाती पुन्हा या बांबू वनक्षेत्रात वास्तव्य करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच वातावरणातील ५० टनांहून अधिक कार्बन डायऑक्साइडसारखे घातक वायू बांबू लागवडीमुळे शोषले जात असल्याने पर्यावरणातील समतोल राखण्यास हातभार लागत आहे.
सध्या जिल्ह्यातील बांबू लागवडीमुळे दररोज सुमारे ३० टन ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. आगामी काळात शासनस्तरावर मोठ्या प्रमाणात कामाची संधी उपलब्ध झाल्यास २०३० पर्यंत जिल्ह्यात एक लाख बांबू झाडांची लागवड करून दररोज १०० टनाहून अधिक ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट गाठता येईल, असा विश्वास डॉ. यरटे यांनी व्यक्त केला.