आटपाडी : आटपाडी येथे मंगळवारी सायंकाळी झालला अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मरगळे वस्ती परिसरातील डाळिंब बागांना या वादळाचा सर्वाधिक फटका बसला. अनेक बागांमधील झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत.
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावताच मरगळे वस्ती परिसरातील १५ ते २० शेतकऱ्यांच्या डाळिंब बागांमध्ये हाहाकार माजला. अनेक वर्षांच्या मेहनतीने जोपासलेली मोठी डाळिंबाची झाडे जमिनीदोस्त झाली, तर काही ठिकाणी फांद्या तुटल्याने झाडांवरील फळांचे मोठे नुकसान झाले.
वादळ ओसरल्यानंतर शेतकऱ्यांनी बागांची पाहणी केली असता, संपूर्ण बागेत डाळिंबांचा सडा पडल्याचे पाहायला मिळाले. बाजारात विक्रीसाठी तयार असलेली फळे जमिनीवर पडल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शासनाने या भागाचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.