ऐतवडे बुद्रुक: येथील पिण्याच्या पाण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून दोन पाणी योजना कार्यान्वित झाल्या. पण ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे ऐन पावसाळ्यातच टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
उन्हाळ्यात एका एक दिवस पाणीपुरवठा केला. पण पावसाळ्यात पाणी उशाला, कोरड घशाला अशी अवस्था ग्रामस्थांची झाली आहे. सहा दिवसापासून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी नाही. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या समन्वय अभावी कर्मचाऱ्यांची पाणी देण्यासाठी, वसुलीसाठी त्रेधा तिरपीट उडत आहे.
शिराळा आष्टा दरम्यानच्या मुख्य रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणामुळे अनेक ठिकाणी मुख्य जलवाहिनीची संबंधित ठेकेदाराने चाळण करून ठेवले आहे. तर सुमारे दोन कोटीची सात किलोमीटर लांबीची नदीवरून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली. पण काही ठिकाणी मुख्य जलवाहिनी चुकीची झाल्यामुळे पूर्ण क्षमतेने पाण्याच्या टाकीमध्ये पाणी पडत नाही.